बार्शी विशेष : बाजार समितीच्या व्यापार संकुलातील गाळ्याच्या विक्रीपोटी २३ लाख २५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली अशी फिर्याद बार्शी शहर पोलिसात दाखल झाली आहे.
याबाबत रोहिणी सचिन गायकवाड (वय ३६) रा. मांगडे चाळ, तुळजापूर रस्ता, बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बार्शी शहरातील तुळजापूर रस्त्यावर असलेल्या बाजार समिती व्यापार संकुलातील गाळा क्र. २१ हा आबासाहेब शामराव जराड यांनी त्यांच्या प्रापंचिक व वैयक्तिक गरजेपोटी विक्रीस काढल्याचे मला समजले. इलेक्ट्रीक वस्तूंच्या व्यवसायासाठी मला गाळ्याची गरज असल्यामुळे, आबासाहेब जराड यांचेकडून तो गाळा २३ लाख २५ हजार किंमतीस घेण्याचा व्यवहार दि. १५ जून २०२३ रोजी ठरला.
जराड यांना मी त्याच दिवशी १२ लाख रुपये रोख आणि साडेपाच लाख रुपयांचे दोन धनादेश दिले, व राहिलेले २५ हजार रुपये गाळ्याचा ताबा घेतल्यानंतर देण्याचे ठरले. आबासाहेब जराड यांनी दि. १५ जून रोजी याची नोटरी करुन दिली. त्यानंतर पंधरा दिवसांनी गाळ्याची चावी दिल्यानंतर मी राहिलेले २५ हजार रुपये जराड यांना रोख दिले.
दि. ५ जुलै २०२३ रोजी आबासाहेब जराड यांनी सध्या व्यवसाय कमी झाल्यामुळे गाळ्याची गरज नसल्याचे सांगून, अनामत रकमेसह गाळ्याचा ताबा बाजार समितीकडे देण्याबाबत पत्रव्यवहार केला. त्यानंतर दि. २८ सप्टेंबर रोजी मी गाळा माझ्या नावावर नोंद होण्यासाठी बाजार समितीशी पत्रव्यवहार केला.
त्याच्या दुसऱ्या दिवशी, आबासाहेब जराड यांनी आपणासोबत केलेली नोटरी बेकायदेशीर असून, सदरचा गाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ताब्यात आहे, व बाजार समितीच्या मालकीची मालमत्ता दुसऱ्या कोणासही विक्री करता येत नाही. त्यामुळे सदर गाळा आपले नावावर लावता येणार नाही असे पत्र बाजार समितीकडून मला मिळाले.
यावरुन माझी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे, मला सदरचा व्यवहार नको माझे पैसे परत द्या असे मी फोनवरुन जराड यांना सांगितले, त्यावेळी मी लोकांचे, बँकेचे पैसे भरले आहेत, परत देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, आणि सतत पैसे मागितल्यास आत्महत्या करेन अशी धमकी जराड यांनी दिली, अशी फिर्याद रोहिणी सचिन गायकवाड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
