मेघदूत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
बार्शी विशेष : मानवी जीवन हे काव्यच आहे. जोपर्यंत कवी अस्वस्थ होत नाही, तोपर्यंत कविता निर्माण होत नाही. कविता म्हणजे मानवी जीवनातील मांगल्याचा सारांश असतो असे प्रतिपादन डॉ. रजनी जोशी यांनी केले.
डॉ रजनी जोशी यांच्या हस्ते कवी कालिदास मंडळाचा मेघदूत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. कालिदास मंडळ हे कवितेचा अखंड जागर करणारे मंडळ आहे. कार्यात सातत्य जपणारं आणि प्रतिभावंतांचा सत्कार, प्रतिभेचे स्वागत करणारं मंडळ असल्याचे गौरवोद्गार ही त्यांनी काढले. प्रा. पुनीत मातकर व प्रा. मुकुंद वलेकर यांना मेघदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी कालिदास मंडळाच्या सातत्याबद्दल कौतुक केले. यावेळी प्रमुख अतिथी गिरीश दुनाखे, पुरस्कार प्राप्त कवी प्रा. पुनीत मातकर, प्रा. मुकुंद वलेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. पुरस्कार प्राप्त काव्यसंग्रहावर परीक्षक डॉ. रविराज फुरडे, आबासाहेब घावटे यांनी भाष्य केले. यावेळी व्यासपीठावर म.सा.प. बार्शीचे अध्यक्ष पां. न. निपाणीकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे, यांनी आभार प्रदर्शन प्रकाश गव्हाणे यांनी तर सूत्रसंचालन सुमन चंद्रशेखर यांनी केले. स्वागतगीत मैनुद्दीन तांबोळी यांनी गायले.
यावेळी मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय काव्य लेखन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. निकाल पुढीलप्रमाणे, प्रथम : नरसिंहेश्वर शिंदे, द्वितीय : विजया मनगिरे, तृतीय : विजयश्री गवळी, उत्तेजनार्थ : युवराज जगताप व गौरी स्वामी.
यावेळी दत्ता गोसावी, शिवानंद चंद्रशेखर, मारुती कटकधोंड, श्रीकांत कुलकर्णी, प्राचार्य विठ्ठल वलेकर, डॉ. सुनील विभूते, शारदा पानगांवकर, स्वाती इकारे, अर्चना पोळ यांच्यासह साहित्य रसिक उपस्थित होते.

