बार्शी विशेष : कुर्डूवाडी-लातूर बायपास रस्त्यावरील नागोबाची वाडी चौकात एका दुचाकीचा अपघात झाल्यामुळे दुचाकी स्वार जखमी होऊन रक्त येत असलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला होता. रस्त्याने येणारे जाणारे लोक मात्र बघ्याची भूमिका घेत होते.
भगवंत सेना दलाचे सदस्य अक्षय बारंगुळे यांना या अपघाताची माहिती समजताच त्यांनी त्वरेने घटनास्थळी धाव घेतली. अपघातामधील जखमीची अवस्था पाहून अक्षय बारंगुळे यांनी घटनास्थळी उपस्थित सुमेशसिंह जाधव व विजयराज पाटील यांच्या मदतीने त्या जखमी युवकाला तत्काळ बार्शीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे जखमी युवकास वेळेवर उपचार मिळाले. जखमीचे नाव सुरेश रमेश कदम (वय २८) रा. गाताची वाडी असल्याचे समजल्याने, भगवंत सेना दलाच्या सदस्यांनी जखमीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना या घटनेची माहिती दिली.
बार्शी येथे भगवंत सेना दलाची नव्यानेच स्थापना झाली असून, या घटनेवरुन लोकांच्या मदतीसाठी ही संघटना सक्रिय झाल्याचे दिसते.