बार्शी विशेष : सहकार भारती बार्शी शाखेच्या वतीने येथील सहकारी बँका, पतसंस्था व मल्टीस्टेटच्या संचालक व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बार्शी तालुक्यातील ८ संस्थांच्या ४६ संचालक व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण महर्षी अरूणदादा बारबोले यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर प्रशिक्षक संतोष मानूरकर, महामंत्री बोरामणी, जिल्हा सदस्य मुरलीधर चव्हाण तसेच बार्शी तालुका अध्यक्ष अमित इंगोले उपस्थित होते.
उद्घाटनपर विचार व्यक्त करताना अरूणदादा म्हणाले, बॅकिंग क्षेत्रात काम करणे अवघड झाले आहे, वेगाने बदलणारे नियम, सोशल मीडियाचा चुकीचा वापर यामुळे व्यवसायावर गंभीर परिणाम होताना दिसत आहेत. एक चुकीचा मेसेज गेला तर अनेक वर्षांची मेहनत वाया जाते. अशा वेळेस शासन ही त्वरीत मदत करू शकत नाही. पतसंस्थेला सिबील नसल्यामुळे देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, आपण तालुका पातळीवर जर आप-आपल्यात एन.ओ.सी देण्याचे काम केले तरी खूप मोठा फायदा सर्वांनाच होणार आहे. तालुका अध्यक्ष अमित इंगोले यांनी सहकार भारतीचे कार्यावर प्रकाश टाकत यापुढे असे विविध उपक्रम सहकार भारती राबविणार असल्याचे सांगितले.
प्रशिक्षक व शासकीय ऑडिटर असणारे संतोष मानूरकर यांनी अवती-भवती या सदरान्वये चालू परिस्थीतीनुसार अनेक उदाहरण देऊन वर्तमान परिस्थीती सांगितली. तसेच सहकार खात्याचे विविध परिपत्रक व नियमावली अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितले.
प्रशिक्षण घेणे खर्चीक आहे परंतु न घेणे महागडे आहे.
- संतोष मानूरकर, प्रशिक्षक
केवायसी विषयावर मार्गदर्शन करीत असताना केतकर साहेबांनी केवायसीची गरज व महत्व या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या पस्तीस वर्ष नोकरीच्या काळात कसे बदल होत गेले व केवायसी किती गरजेची आहे ? केवायसी न करण्याचे धोके किती कामकाज करताना कोण-कोणते कागदपत्र गरजेचे आहेत हे त्यांनी विशद केले.
दुपारच्या सत्रात वैधानिक लेखापरीक्षणाची तयारी कशी करावी या विषयावर संतोष मानूरकर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सहभागी पतसंस्था, सहकारी बँका व मल्टीस्टेटच्या पदाधिकारी, सदस्यांचा सत्कार करण्यात आला. प्रशिक्षणाचा समारोप संघटनमंत्री चंद्रकांत धोंडे-पाटील यांनी केला, सूत्रसंचालन अनिल खजानदार यांनी केले तर आभार गणेश शिंदे यांनी मानले. सचिव विजय शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्यांनी परिश्रम घेतले.
सहभागी सर्वांना सहकार भारतीच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. प्रशिक्षणामुळे अनेक शंकांचे निरसन झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

