बार्शी विशेष : बार्शीतील श्रीस्वामिनारायण मंदिरात झालेल्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त महापूजा विधी व वर्धापन दिनानिमित्त मूर्तींना अभिषेकचा कार्यक्रम दुपारी ४ वाजता संपन्न झाला. त्यानंतर १२५ हून अधिक विविध प्रकारच्या अन्नपदार्थांचा नैवेद्य देवांना दाखविण्यात आला. याप्रसंगी दादर मुंबई येथील पूज्य प्रीतमप्रसाद स्वामी, सुबोधसागर स्वामी तसेच पुणे येथील पूज्य त्यागानंद स्वामी, पूज्य श्रुतीवल्लभ स्वामी व पूज्य निर्दोषनयन स्वामी उपस्थित होते.
अध्यात्मिक भक्तीशिवाय माणसाचे आयुष्य सुखकर होऊ शकत नाही, त्यामुळेच तालुक्यातील कोणताच धार्मिक कार्यक्रम मी चुकवत नाही. जेव्हा पण आपण देवाच्या दर्शनाला जातो तेव्हा आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येतात. तसेच कोणतेही चुकीचे काम होणार नाही याची जाणीव प्रत्येक वेळेस होते. बार्शी हे पौराणिक शहर असून समृद्ध असा धार्मिक वारसा या शहराला लाभलेला आहे. सर्व जाती-धर्माचे लोक एकमेकांचे सण-उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करतात असे मत यावेळी बोलताना आ. राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केले. तसेच बार्शीला लवकरच विशेष तीर्थक्षेत्राचा दर्जा ही प्राप्त होणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
बी.ए.पी.एस. स्वामिनारायण संस्था ही विश्वव्यापी संस्था असून जगभर बाराशे पेक्षा जास्त मंदिरे, गांधीनगर व दिल्ली येथे अक्षरधाम मंदिर आहे. संस्थेला एनजीओ म्हणून युनोमध्ये कायम सदस्यत्व आहे. आबूधाबी व अमेरिकेत देखील भव्य मंदिराचे काम चालू आहे. तसेच भूकंप, त्सुनामी, पूर, दुष्काळ, अशा संकटसमयी तातडीने मदत पोहचविण्याचे काम संस्था करते, तसेच कोरोनाच्या प्रादूर्भावादरम्यान सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा, अन्नसेवा, ऑक्सिजन सेवा संस्थेने पुरविल्या आहेत. युक्रेन युध्दावेळी भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित आणण्यासाठी देखील संस्थेचा खूप मोठा वाटा आहे. लहान मुलांसाठी, युवकांसाठी, महिला व पुरूषांसाठी प्रत्येक रविवारी सत्संग सभा असते. संस्कार व संस्कृतीचे ज्ञान या सत्संगामधून दिले जाते. असे संस्थेची माहिती देताना पूज्य त्यागानंद स्वामींनी सांगितले.
यावेळी मा. नगराध्यक्ष विश्वास बारबोले, मा. नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, मा. उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, मा. विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, मा. नगरसेवक प्रशांत कथले, भगवंत देवस्थानचे सरपंच दादासाहेब बुडूख, धन्यकुमार पटवा, कमलेश मेहता, राहुल चांडक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामिनारायण मंदिर, बार्शीचे ट्रस्टी भरतभाई ठक्कर, महेंद्रभाई ठक्कर तसेच राजेश माळी, महादेव साळुंखे, सुभाष पूरोहित, प्रशांत ठक्कर, गणेश शिंदे, तेजस ठक्कर, अमित शेटे, अमोल पल्लोड, आशीष मल्होत्रा, विजय काकडे, कल्पेश चंदे, विमल सोमैया, आदींनी परिश्रम घेतले.

