बार्शी विशेष : नाशिक आणि अहमदनगर येथील व्यापाऱ्यांनी कारीतील द्राक्ष बागायतदाराला ६२ हजार रुपयांना फसविल्याची घटना समोर आली आहे. याबद्दल डॉ. देवेंद्र रामलिंग डोके (वय ३७) रा. कारी, ता. धाराशिव यांनी पांगरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
डोके यांची तोडणीला आलेली द्राक्ष बाग बघण्यासाठी, गावातील समाधान उर्फ बबलू प्रकाश जाधव यांच्या ओळखीने, सागर चिमण काकड (रा. संगमनेर, जि. अहमदनगर) व बापू निमगिरे (रा. निफाड, जि. नाशिक) हे व्यापारी १२ फेब्रुवारी रोजी आले होते. त्यावेळी त्या दोघांनी आम्ही भागीदारीत द्राक्षांचा व्यापार करतो असे सांगून ४२ रुपये दराने बाग ठरविली होती.
त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी त्या दोघांनी डोके यांच्या बागेतून ६ टन द्राक्षे आयशर वाहनातून भरून नेली, आणि ठरलेल्या दरानुसार मालाची झालेली किंमत २ लाख ५२ हजार रुपयांपैकी सागर चिमण काकड याने डोके यांच्या बँक खात्यावर १ लाख १० हजार रुपये त्वरित पाठविले, आणि राहिलेले १ लाख ४२ हजार उद्या देतो असे सांगितले.
त्यानंतर डोके यांनी फोन केल्यावर पट्टी आली नाही, दोन दिवसात पाठवितो अशी कारणे वेळोवेळी सांगत, एकवेळेस ५० हजार व पुन्हा एकवेळेस ३० हजार रुपये पाठविले.
त्यानंतर उर्वरित रक्कम रुपये ६२ हजार रुपये पाठवावेत म्हणून डोके यांनी त्या दोघांना अनेकदा फोन केले असता, त्या दोघांनी कॉलचा स्विकार न करुन पैसे देण्यास टाळाटाळ केली. यावरुन ६२ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे डोके यांनी त्या दोघांविरुध्द पांगरी पोलिसात तक्रार दिली आहे.
