बार्शी विशेष : पिकअप टेंपोमधून कत्तलीसाठी नेल्या जात असलेल्या गोवंशाच्या जनावरांची, वैराग पोलिसांनी सुटका करून दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दहिटणे गांवाकडून वैरागकडे जनावरे भरून एक पिकअप टेंपो येत असल्याची माहिती वैराग पोलिसांना मिळाली. गोरक्षकांच्या सहकार्याने पोलिसांनी तो पिकअप टेंपो (क्र. एमएच-१३-सीजी-०८९४) मोहोळ चौक वैराग येथे थांबविला.
सदर पिकअप टेंपोची पाहणी केली असता, त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त, दाटीवाटीने मोठ्या गायी व लहान वासरे, त्यांना वेदना होईल अशा अरूंद जागेत, हालचाल करता येणार नाही अशा पध्दतीने, तसेच त्यांच्या चारापाण्याची व औषधाची कोणतीही सुविधा नाही अशा पध्दतीने अमानुषपणे, निर्दयीपणे कोंबून भरलेली दिसली.
ती गोवंश जनावरे मोजून पाहिली असता, २ जर्सी व २ देशी मोठ्या गायी व २८ लहान वासरे मिळून आली. त्यापैकी एक वासरू मयत झाल्याचे दिसले. पोलिस कारवाईनंतर अंमलदारासोबत पिकअप टेंपोसह गोवंश सोलापूर येथे जमा करण्यासाठी रवाना केले.
पोकॉ शरद कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ईस्माईल अल्ताफ कुरेशी व सिकंदर अब्दुल कुरेशी (दोघे रा. बुधवार पेठ, मोहोळ) यांच्याविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई दि. १३ फेब्रुवारी रोजी रात्री आठचे सुमारास, सपोफौ हळे, पोकॉ चव्हाण, शरद कांबळे, पोहेकॉ गवळी यांनी गोरक्षकांच्या सहकार्याने केली.
