बार्शी विशेष : ग्रामपंचायतीची कामे घेण्याच्या कारणावरून झालेल्या सशस्त्र हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना बार्शी तालुक्यात घडली.
बार्शी तालुक्यातील नारीवाडी गावातील शाळा दुरूस्तीचे जुने पत्रे व गावातील चालू असलेली ग्रामपंचायतीची कामे घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून, विष्णू पोपट पवार यांना, उपसरपंच नामदेव लिंबराज वाघ, हनुमंत लिंबराज वाघ, अंकुश लिंबराज वाघ व पप्पू सदाशिव वाघ (सर्व रा. नारीवाडी) या चौघांनी संगनमत करून शिवीगाळी करत, पायावर, गळ्यावर, डोक्यावर काठी, दगड, लोखंडी गज व कोयत्याने बेशुध्द होईपर्यंत बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले, अशी फिर्याद जखमीचे भाऊ दत्तात्रय पोपट पवार (वय ४३) रा. नारी, ता. बार्शी यांनी पांगरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
ही घटना दि. ८ फेब्रुवारी रोजी रात्री आठचे सुमारास नारीवाडीच्या बस थांबा चौकातील एका हॉटेलसमोर घडली. जखमी झालेल्या व्यक्तीवर बार्शीतील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सदर फिर्यादीनुसार चौघांविरोधात पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
