![]() |
बार्शी विशेष : तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेने चालू वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने, खरीप हंगामातील पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टी, संततधार पाऊस पडल्याने पिकाची वाढ न होणे, पीकाचा फुलोरा गळणे, सोयाबीनच्या झाडाला शेंगा नसणे किंवा कमी असणे, लहान असणे अशा अनेक कारणामुळे चालू वर्षी पीकाचे नुकसान झाले होते.
तालुक्यात खरीप हंगामातील पिकविमा भरलेल्या १ लाख १ हजार २८ शेतकऱ्यांपैकी ९८ हजार शेतकऱ्यांनी पीकांचे नुकसान झाल्याची पूर्वसूचना दिल्या होती, तर विमा कंपनीने पंचनामे केल्यानंतर ५ हजार ११० शेतकरी अपात्र ठरवले होते. तसेच तालुक्यातील ७६ हजार शेतकऱ्यांना ६५ कोटी पीक विमा वाटप करण्यात आला आहे.
तहसील कार्यालय बार्शी येथे नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, जिल्हा पीक विमा प्रतिनिधी जगदीश कोळी, शेतकरी प्रतिनिधी राहुल भड, हर्षवर्धन बोधले, महेश चव्हाण, अशोक माळी, वैशाली ढगे आदी उपस्थित होते.
तालुक्यातील पीक विम्यापासून वंचित असणाऱ्या १७ हजार ५०० शेतकऱ्यांचा पीक विमा १५ दिवसांच्या आत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल, शेतकऱ्यांनी २५ जानेवारीचे बेमुदत उपोषण मागे घ्यावे असे आवाहन जिल्हा पीक विमा प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बैठकीत केले.
