![]() |
बार्शी विशेष : शहर व तालुक्याच्या विकासाचे प्रश्न मांडण्यासाठी पत्रकारांनी काळानुरूप बदल करणे आवश्यक आहे, असे मत आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केले.
दि. ६ जानेवारी रोजी श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या सभागृहात, बार्शी प्रेस क्लबच्या वतीने, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून आ. राऊत बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर तहसिलदार सुनिल शेरखाने, निवासी नायब तहसिलदार संजीवन मुंढे, बार्शी नगपरिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, येडेश्वरी शुगर साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारूद्र परजणे, डॉ. संजय अंधारे, डॉ. अमित पडवळ, बार्शी प्रेस क्लबचे अध्यक्ष अजित कुंकूलोळ उपस्थित होते.
पत्रकारांनी ऐकीव अपुर्या माहितीवर लेखन करणे टाळून वस्तुनिष्ठ बातम्या लिहाव्यात. अलीकडच्या काळात काही चुकांमुळे पत्रकारितेला वेगळे वळण लागत आहे, पत्रकारितेतील अप्रवृत्तींना वेळीच आळा बसणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही राऊत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
या कार्यक्रमात बजरंग सोनवणे, तसहिलदार सुनिल शेरखाने, पो. नि. आण्णासाहेब मांजरे, डॉ. अंधारे, सचिन अपसिंगकर, सचिन वायकुळे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे प्रास्तविक करताना प्रेस क्लबचे अध्यक्ष कुंकूलोळ यांनी सांगितले. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सूत्रसंचालन धीरज शेळके यांनी केले तर आभार शहाजी फुरडे यांनी मानले. राष्ट्रगीतीने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमासाठी प्रेस क्लब, साप्ताहिक संपादक संघटना व डिजीटल मिडीयातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार भवनासाठी २५ लाखांचा निधी
बार्शी शहराच्या मध्यवर्ती भागात अद्ययावत पत्रकार भवन बांधण्यासाठी आमदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा यावेळी आमदार राऊत यांनी यावेळी बोलताना केली.

