![]() |
बार्शी विशेष : सगळ्या कायदेशीर प्रक्रिया धाब्यावर बसवून गरीब मागासवर्गीय महिलांच्या जीवाशी खेळ केला गेला असल्यामुळे, कामगार खात्याचे अधिकारी, पर्यावरण खात्याचे अधिकारी, पांगरीचे सपोनि, बार्शी तालुक्याचे डीवायएसपी, तहसिलदार अशा सर्व संबंधित अधिकाऱ्यांना, दलित महिलांच्या सामूहिक हत्यांकांडास जबाबदार धरुन सहआरोपी करुन, त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी केली.
बार्शी तालुक्यातील शिराळे येथे १ जानेवारीला झालेल्या फटाका कारखान्यातील स्फोटात, मृत्यु पावलेल्या व जखमी झालेल्या कामगार कुटुंबियाची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या स्फोटात पाच व्यक्तींचा मृत्यु होऊन सात दिवस उलटले, तरीही प्रशासनाकडून त्यांना हक्काची आर्थिक मदत अद्याप मिळालेली नाही असा आरोप त्यांनी केला. मृत व्यक्तींना मानवी हक्क अभियान, अनुसूचित जाति आयोग आणि महिला आयोग यांच्या माध्यमातून न्याय मिळवून देणार असल्याचे सांगून, न्याय मिळेपर्यंत लढा चालूच राहिल असे ते म्हणाले.
दुर्घटना घडलेल्या दिवशी सुट्टी असूनही बळजबरीने कामगारांना कामावर नेण्यात आले, त्यांची मानसिक, आर्थिक, शारीरीक पिळवणूक केली गेली. या प्रकरणात पुरवणी जबाबाअंतर्गत अॅट्रॉसिटी कलमानुसार गुन्हा दाखल करावा, ज्यांच्याकडे ही चौकशी सोपविलेली आहे, तेच अधिकारी दोषी असल्यामुळे त्यांना सहआरोपी करून कारवाई करण्यात यावी. या प्रकरणाची उच्च न्यायाधिशामार्फत चौकशी केली जावी अशी मागणी लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णूभाऊ कांबळे यांनी यावेळी बोलताना केली.
या पत्रकार परिषदेस महादेव भोसले, नवनाथ चांदणे, युवराज पवार, अॅड. शैलेश पोटफोडे, लखन शेंडगे, प्रा. मारूती लोंढे, रमेश बोराडे, हिरालाल अडगळे, सतीश बगाडे, अण्णा कांबळे, सोमनाथ कसबे, दास पवार, प्रशांत काळे आदी उपस्थित होते.
