![]() |
बार्शी विशेष : तीन गायींवर विषप्रयोग करुन त्यांना जीवे ठार मारले अशी तक्रार तुषार बिभिषण अलाट (वय २४) रा. धामणगांव, ता. बार्शी यांनी वैराग पोलिस ठाण्यात दिली आहे.
अलाट यांनी शेतीला जोडधंदा म्हणून पाच जर्सी गायी पाळल्या आहेत. शेतातील कॅनल पत्राशेड समोरील मोकळ्या जागेत त्या बांधलेल्या असतात आणि त्यांच्या देखरेखीसाठी लखन डोळसे यांस कामावर ठेवलेले आहे.
दि. २२ डिसेंबर रोजी रात्री गायींना चारापाणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी २३ डिसेंबर रोजी पहाटे लखनसह ते धारा काढण्यासाठी गायींकडे गेले. तेव्हा दोन जर्सी गायी उभ्या असलेल्या दिसल्या व दोन बांधलेल्या ठिकाणी मयत झालेल्या दिसल्या तसेच आणखी एक गाय कॅनलमध्ये मृत अवस्थेत पडलेली दिसली.
त्या दोघांनी आजूबाजूस पाहणी केली असता काही आढळून आले नाही. मयत गायींचे तोंडातून पाणी येत असल्याने व त्यांचे पोट फुगलेले दिसल्याने गायींना कुणीतरी विषप्रयोग करुन जीवे ठार मारल्याची अलाट यांची खात्री पटली. त्यांच्या तक्रारीवरुन वैराग पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
