भारत सरकार द्वारा आयोजित नेहरु युवा केंद्र सोलापूर, क्रांती बहुद्देशीय संस्था व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने, बार्शी येथील संत तुकाराम सभाग्रहामध्ये, युवक व युवतींसाठी "जिल्हास्तरीय युवा संसद" कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून बार्शी येथील दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, तेजवंतसिंघ संधू व स्मार्ट अकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे यांनी उपस्थित युवक व युवतींना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी जिल्हा युवा अधिकारी अजितकुमार, क्रांती बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धिरज शेळके, नेहरु युवा केंद्राचे सुभाष चव्हाण, कार्यक्रमाचे सहप्रयोजक चांदमल ज्वेलर्सचे शशांक गुगळे, मुक्ताई डिजिटलचे आदेश शिंदे, श्री करिअर अकॅडमीचे उदय शिंदे, मिथलेश दीक्षित आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आपण ध्रुवताऱ्याचा आदर्श घेऊन या ताऱ्यासारखे चमकायला हवे. तसे चमकण्यासाठी काही गोष्टींचे अनुकरण आपण केले पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या बोलण्यामध्ये गोडवा असला पाहिजे, नम्रता, आदर, इतरांना शुभेच्छा देणे, इतरांची काळजी घेणे आणि सर्वांशी प्रेमाने वागणे या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपल्या विचारावर लक्ष असले पाहिजे, बोलताना शब्दावर लक्ष असले पाहिजे, आपले कर्म ही तेवढीच प्रामाणिक असले पाहिजेत आणि स्वतः मधले गुण ओळखून वेळेचे बंधन पाळणे पाहिजे. यशस्वी होण्यासाठी सकारात्मक उद्देश ठेवून सकारात्मक मार्ग निवडला तर नक्कीच आपण ध्रुव ताऱ्यासारखे चमकल्या शिवाय राहणार नाही असे वक्तव्य न्यायाधीश तेजिवंतसिंघ संधू यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी किल्ला जिंकला, संत ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, त्यांचा आदर्श घेऊन आपणही योग्य वयामध्ये आणि योग्य वेळेमध्ये, योग्य मार्गदर्शन घेऊन योग्य करिअरला सुरुवात करणे गरजेचे आहे. यामध्ये योग्य मार्ग निवडला आणि उंचीचे स्वप्न बघितले तर यश नक्कीच तुमच्या पाठीशी आल्याशिवाय राहणार नाही. व्हॅलेंटाईन डे ला गुलाब देण्यापेक्षा एकदा आई-वडिलांकडे आणि त्यांच्या कष्टाकडे बघा, चिकित्सक पद्धतीने संधीचे सोने करत, शालेय शिक्षणाबरोबर इतर शिक्षण घेऊन योग्य निवडीने यशाच्या शिखरापर्यंत आपण पोहोचू शकता. त्यासाठी माणूस म्हणून अगोदर स्वतःवर प्रेम करायला शिका असे प्रतिपादन स्मार्ट अकॅडमीचे संचालक सचिन वायकुळे यांनी केले.
तर महिला सबलीकरण या विषयावर बोलताना, महिला सबलीकरण करील तो खरा नाथ! कायदा सुव्यवस्था राखण्या देऊनी साथ! स्वयंरोजगार करण्या समर्थ होऊ दे हाथ! अश्या काव्यपंक्तीनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे यांनी उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाप्रसंगी तालुक्यातील विविध क्षेत्रात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी अजितकुमार यांनी केले तर सूत्रसंचालन धिरज शेळके यांनी केले.